Saturday, January 21, 2006

भारत वि. इंडिया

अगदी सकाळचीच गोष्ट. मी आणि माझ्या मित्रामध्ये संभाषण सुरु होतं.

“मग काय, इंडियाला परत कधी येतो आहेस?” – मित्र
“का रे बाबा, भारताचा इंडिया केव्हापासून केलास?” – मी. मराठी बोलताना कोणी भारताचा ‘इंडिया’ केला की मला मनस्वी संताप येतो.
‘अरे वा, जपानमध्ये गेल्यावर त्या लोकांकडे बघून तुला पण हे नविन भाषाप्रेम सुचलेलं दिसतंय’
‘तसं काही नाहीये. मला इथे येण्यापूर्वीही ही गोष्ट आवडत नव्हती आणि आजही आवडत नाही. आणि इंग्रजांच्या भाषेत कितीही चांगलं वाटलं तरी आपल्या मायमराठीच्या तोंडी भारताचं ‘इंडिया’ हे नाव शोभत नाही हेच खरं.’
‘बाळ, तू कुठल्या जगात वावरतोयस? तू राहात असलेला ‘भारत’ कधीच अस्तास गेला. आता नविन ‘इंडिया’ उदयास आलाय. पूर्वी इंडिया म्हणणं फॅशन होती. आता ते स्टॅंडर्ड झालं आहे. ‘भारत’ म्हणजे अगदी खेडवळ वाटतं. ‘इंडिया’ बघ कसं एकदम पॉलिश्ड आणि cool वाटतं. अरे, जिथे खेड्यातसुध्दा आजकाल कोणी भारत असं म्हणत नाहीत, तिथे तुझं माझं काय घेउन बसलास. त्यामुळं तूही आता ते जुनंपुराणं नाव टाकून नविन स्टाईलीश ‘इंडिया’ म्हणायला सुरुवात कर.’
‘अरे नाव म्हणजे काय वस्त्रं आहेत का जुनी टाकून नवी परिधान करायला? आम्ही होतो तिथेच बरे आहोत. तुझं ते पॉलिश्ड आणि cool नाव तुलाच लखलाभ असो’
असं म्हणून मी ते संभाषण बंद केलं खरं, पण माझ्या डोक्यात पुन्हा एकदा विचारचक्रं फिरु लागली आणि तावातावानं ही नोंद लिहायला घेतली.

“एखाद्याच्या तोंडून भारताऐवजी ‘इंडिया’ असं ऐकिवात आलं तर महाशय NRI आहेत असं समजावं” असं वर्षा-दोन वर्षांपूर्वी शेखर सुमन त्याच्या कुठल्याश्या एका कार्यक्रमात म्हणाला होता. त्यामुळे आजपर्यंत ‘इंडिया’ म्हणणं म्हणजे निव्वळ NRI अर्थात् Non Required Indians चीच मक्तेदारी होती असंच मला वाटायचं. वर्षा-दोन वर्षात परिस्थिती एवढी बदलली? याचं कारण काय बरं असावं? अर्थात उत्तर सापडायला फार वेळ लागला नाही. म्हणजे बघा. टी.व्ही वरची क्रिकेटची मॅचच घ्या. कॉमेंटेटर ची वाक्यं ही अशी
“इंडिया को जीतने के लिये १ ओवर में ११ रनोंकी जरुरत. बोहोत ही खराब सिच्युएशन. इंडिया का जीतना मुश्कील. चेतन आपको क्या लगता है, क्या युवराज सिंग और कुंबले इस सिच्युएशन से इंडिया को बाहर निकाल पाएंगे?”
हे तर काहीच नाही. सर्वात कहर केलाय तो ‘व्ही.जे’ आणि तत्सम ‘अँकर्स’नी. नुकत्याच झालेल्या स्टार वनवरच्या laughter challenge च्या कार्यक्रमाची ही अँकर पाहा कशी बोलतेय.
“केहते है A laugh a day keeps the doctor away. So welcome to the first ever एक ऐसा शो जो हसा-हसाके आपको घायल करदेगा. हम आपके लिये ढूंढके लाये है इंडिया के टॉप funny 50 और हर हफ्ते we get you five of them. So let’s see कौन बनेगा इंडिया का नंबर वन कॉमिक”
अहाहा¡ काय Hinglish (Hindi + English) आहे. ऐकून कान अगदी तृप्त झाले. ‘M’ आणि ‘V’ वाहिन्यांवरच्या V.J. बद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यांनी तर स्टॅंडर्ड Hinglish कसं बोलावं याचा नविन आदर्शच उभा करुन ठेवलाय.

आता माझ्या मित्रासारखे काही लोक म्हणतील
‘च्यामारी, त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू दे ना. तुला काय प्रॉब्लेम आहे. या देशात, चुकलो, ‘इंडियात’ प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. कोणी काय म्हणावं हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला?’
खरं आहे. ह्या सर्वांबद्दल आक्षेप घेण्याचा मला काहीच अधिकार नाही. आणि कदाचित नकळतपणे मीही या मार्गावरुन गेलो असेन किंवा जात असणारच. पण आत कुठेतरी एक आंतरिक टोचणी लागून राहते की हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. बदललं पाहिजे. कारण शेवटी बदलणं हे आपल्याच हातात असतं नाही का? (ही वरची वाक्यं कुठेतरी वाचल्यासारखी वाटतायत. मला अशा वेळी अगदी टीपीकल चित्रपटातले किंवा कथांमधले उपदेशाचे डोस का आठवतात कुणास ठावूक. भावनेच्या भरात ही नोंद लिहीत असल्यामुळे असेल कदाचित. असो.) आत्ताच आजचा सकाळचा अग्रलेख वाचला. काय योगायोग आहे. अग्रलेखाचा विषय आहे ‘मराठी अस्मितेचा आग्रह’. म्हणजे आम्ही इतरांपेक्षा फारसा वेगळा विचार नाही करत आहोत तर. पण मग हे सगळं होण्याचं कारण काय असावं? काहीही असो. ‘इंडिया शायनिंग’ चा हळूहळू वाढत चाललेला प्रभाव कुठेतरी कमी करुन ‘भारत उदय’ घडवायला हवा. चला, आपण आपल्यापासूनच सुरुवात करुया.
हीहीही. माझं मलाच हसू येतंय. मघापासून विचार करतोय. हे मी लिहीतोय हे कशाची तरी आठवण करुन देतंय. आत्ता आठवलं. दूरदर्शनवरची राष्ट्रीय साक्षरता मिशनची जाहिरात. 'चलो पढाएं, कुछ कर दिखाएं'.
दूरदर्शन झिंदाबाद!
आता एवढं सगळं गंभीरपणे लिहील्यावर ही नोंद या गाण्याशिवाय कशी पूर्ण होईल?

भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है

सदियों से भारतभूमी दुनिया की शान है
भारत मां की रक्षा में जीवन कुर्बान है

भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है ...

ही नोंद २६ जानेवारीसाठी परफेक्ट आहे एकदम. काय म्हणता?

।। जय भारत ।।

Monday, January 16, 2006

सफर राजप्रासादाची

रविवारी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रातलं साप्ताहिक राशिभविष्य वाचलं. दर आठवडयाला मी नित्यनेमानं भविष्य वाचतो खरं, पण त्यातलं फारसं काही मनावर घेत नाही. आणि भविष्य वाचून झाल्यावर दुस-या मिनीटाला त्यातलं काहीही लक्षातही राहिलेलं नसतं. पण वाचताना मजा येते. ज्योतिषी महोदयांनी बहुदा एकदाच काय ते पाच-पन्नास प्रकारचं भविष्य लिहून ठेवलेलं असावं. अचानक धनलाभ संभवतो, प्रत्येक कृतीतून यश, खर्चाला आवर घाला, अनुकूलतेकडे नेणारा सप्ताह, मानसन्मान मिळेल, वाहन जपून चालवा, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, विचारपूर्वक निर्णय घ्या असं काहीतरी भविष्य १२ राशींना परम्युटेशन आणि कॉम्बीनेशन करुन आलटून पालटून येत असावं. या आठवड्यात मात्र माझ्या भविष्यामध्ये चक्क ‘लेखन व प्रकाशनाच्या क्षेत्रात प्रसिध्दी मिळेल’ असं लिहीलं होतं. खरं तर अलिकडे काही लिहायला वेळ मिळत नाहीये. पण भविष्य वाचल्यावर मनात म्हटलं आता काहीतरी लिहायलाच पाहिजे. पण काही सुचेना. मग मागच्या महिन्यातल्या राजप्रासादाच्या सहलीविषयी थोडसं लिहावं म्हटलं.

२३ डिसेंबरला जपानच्या सम्राटाचा वाढदिवस असतो. त्या दिवशी पूर्ण जपानला सुट्टी असते. लोकांना राजप्रासादात जाउन सम्राटाला भेटायची संधी मिळते. राजप्रासाद वर्षातून दोनच दिवस सामान्य लोकांना पाहण्यासाठी खुला असतो. एक म्हणजे २३ डिसेंबर आणि दुसरा नविन वर्षाच्या पहिला आठवड्यातील दुसरा दिवस. या वेळी प्रयोगशाळेतील एक मुलगा आम्हा परदेशी विद्यार्थ्यांना सम्राटाला पाहण्यासाठी घेउन गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची सुध्दा ही पहिलीच वेळ होती.

टोकियो शहराच्या मध्यभागी टोलेजंग इमारतींच्या मधोमध शेकडो एकर जमिन एखाद्या राजाचीच असू शकते. टोकियो स्थानकावर उतरुन समोर थोडंसं अंतर चालून गेल्यावर राजवाड्याची सर्वात बाहेरील बाग आणि प्रवेशद्वार दिसू लागतं.




राजवाडा चोहोबाजूंनी असा खंदकानं वेढलेला आहे. आत अजून किती अंतर चालावं लागतं कोण जाणे असा विचार करत पुढे निघालो.







बाहेरील प्रवेशद्वारावर असं शाही स्वागत झालं.











खूप अंतर आत चालून गेल्यावर ही मुख्य राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील इमारत दिसली.



मुख्य राजवाड्याच्या आत राजाला पाहण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येकाच्या हातात जपानचा राष्ट्रध्वज होता. सम्राट शाही परिवारासोबत दूरवर दिसणा-या बाहेरील सज्जावर येताच लोकांनी हातातील झेंडे फडकावत 'सम्राटांना दहा हजार वर्षे आयुष्य लाभो' अशा जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. पाच मिनीटं सारं वातावरण घोषणांनी एकदम भरुन गेलं.


सम्राट आणि सम्राज्ञी यांनीही हात उंचावून अभिवादनाचा असा स्वीकार केला.








राजवाड्यातून दुस-या मार्गानं बाहेर पडताना ही आणखी एक प्रवेशद्वारावरील इमारत दिसली.








सर्वात बाहेरच्या बगीच्यातील कारंजे.








बाहेर पडल्यावर राजवाड्याभोवती एक चक्कर टाकून पाहावी म्हटलं. बाहेरच्या तटबंदीवरील अशी एक चौकी दिसली.










(छायाचित्रांवर टिचकी मारल्यास मोठ्या आकारात पाहता येतील.)